Join us  

Sharad Pawar : शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर फडणवीसांनी सांगितलं 'महाभारत'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 6:31 PM

सुरुवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदास त्यांनी नकार दिला होता. पण, आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

ठळक मुद्देशरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन पवारांच्या विधानावर टीका केलीय.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता, त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असं आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, ही माहितीही पवार यांनी दिली. पिंपरी- चिंचवडमध्ये आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. पवारांच्या या माहितीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. 

सुरुवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदास त्यांनी नकार दिला होता. पण, आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, ही माहिती पवार यांनी दिली. राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल, हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन पवारांच्या विधानावर टीका केलीय. 'द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून त्रास देतेय भाजप

जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरुन त्रास देत आहे. केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत, म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीस