Join us

सुवर्णकारांवर कारवाई

By admin | Updated: June 9, 2015 02:01 IST

भुलेश्वर येथील झव्हेरी बाजार, विठ्ठलवाडी येथील बेकायदा कारखान्यांवर कारवाई करण्यास सी विभाग कार्यालयाने सुरुवात केली आहे़

मुंबई : सुवर्णकारांच्या लहान कारखान्यांमुळे गजबजलेल्या काळबादेवी विभागाचा भडका उडू शकतो़ त्यामुळे ज्वलनशील रसायनांचा साठा करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकण्याची शिफारस पालिकेच्या विशेष समितीने नुकतीच केली होती. त्यानुसार भुलेश्वर येथील झव्हेरी बाजार, विठ्ठलवाडी येथील बेकायदा कारखान्यांवर कारवाई करण्यास सी विभाग कार्यालयाने सुरुवात केली आहे़काळबादेवी येथील आगीच्या भीषण दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल गेल्याच आठवड्यात सादर करण्यात आला़ या अहवालातून गजबजलेल्या झव्हेरी बाजार-भुलेश्वर आणि काळबादेवी विभागासाठी चौकशी समितीने धोक्याची घंटा वाजवली आहे़ सोने घडविण्यासाठी रासायनिक द्रव्य आणि एलपीजी सिलेंडर्सचा साठा या विभागातील जवळपास प्रत्येक इमारतीमधील तळमजल्यावरच्या गोदामांमध्ये केला जात आहे़हा विभाग आगीवरच वसला असल्याने सुवर्णकारांचे छोटे गोदाम व दुकानांवर बंदी आणण्याचा इशारा पालिकेच्या विशेष समितीने दिला आहे़ अशीच शिफारस १४ वर्षांपूर्वी काळबादेवीतील एका आगीच्या चौकशीनंतर नेमलेल्या विशेष समितीने दिली होती़ या वेळी या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाल्यामुळे अखेर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत़ त्यामुळे बेकायदा कारखान्यांवर कारवाई करण्यास सी विभाग कार्यालयाने सुरुवात केली आहे़ (प्रतिनिधी)घातक धुरामुळे रहिवाशांना धोकाया विभागातील घातक धुरामुळे येथील रहिवाशांचा जीव गुदमरत असल्याचे नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने आपल्या अहवालातून सांगितले आहे़ गोकूळ निवासच्या चौकशीतूनही हाच धोका प्रकर्षाने जाणवला आहे़ झव्हेरी बाजार, तेल गल्ली, काळबादेवी, भुलेश्वर येथील साडेतीन हजार सुवर्णकार स्थानिक संघटनांकडे नोंदणीकृत आहेत़ सट्टाबाजार, विठ्ठलवाडी, भुलेश्वर येथील झव्हेरी बाजारात घातक धूर सोडणाऱ्या बेकायदा चिमण्या तोडण्यात आल्या़२००१ मध्ये काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत २४ नागरिकांचा मृत्यू झाला होता़ या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या पालिकेच्या विशेष समितीने सुवर्णकारांची गोदामे काळबादेवी या विभागातून बाहेर हलविण्याची शिफारस केली होती़