Join us

वास्तुविशारद-अभियंत्यांवर कारवाई; बिल्डरांवर का नाही?

By admin | Updated: July 16, 2014 00:06 IST

वादग्रस्त ११० बांधकामांप्रकरणी उल्हासनगर महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार वास्तुविशारद आणि अभियंता यांच्यावर कारवाई केली आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगरवादग्रस्त ११० बांधकामांप्रकरणी उल्हासनगर महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार वास्तुविशारद आणि अभियंता यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र बिल्डर आणि वादग्रस्त बांधकामांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी करण्यात आल्याने ही ११० प्रकरणे पुन्हा ऐरणीवर आली आहेत. नगररचनाकार विभाग ११० प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने या प्रकरणाची चौकशी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बिल्डर, जमीनमालक, वास्तुविशारद, अभियंत्ता आणि पालिका अधिकारी तसेच तत्कालीन नगररचनाकार अरुण गुडगुडे आदींचे धाबे दणाणले आहे. गुडगुडे यांच्यानंतरही चुकीचे बांधकाम परवाने दिल्याच्या तक्रारी आहेत. कॅम्प क्रमांक ३ परिसरातील २००पेक्षा जास्त बांधकाम परवान्यांची चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.तसेच तोरानी या नगररचनाकाराला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गुडगुडे यांच्या कालावधीतील ११० वादग्रस्त बांधकाम प्रकरणे समाजसेवक रवी तलरेजा यांनी उघड केली होती. या प्रकरणी गुडगुडे यांच्यासह अभियंते विनोद खामिदकर, परमेश्वर बुडगे यांना पोलीस कोठडीत जावे लागले होते.महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार ११० प्रकरणांतील १२ वास्तुविशारद आणि अभियंत्यांची सनद रद्द केली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बिल्डरांसह संबंधितांची चौकशी सुरू झाली आहे. या बांधकामांमध्ये स्थानिक नेत्यांचा पैसा अडकल्याने ती अधिकृत असल्याचा कांगावा केला जात आहे. तसा प्रस्ताव पालिका महासभेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.