Join us

अपघातग्रस्त गाड्यांची दुरवस्था

By admin | Updated: May 16, 2014 02:08 IST

गेल्या दहा वर्षांत पनवेल परिसरातून जाणार्‍या विविध मार्गांवर झालेल्या अपघातांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूप वाढले आहे.अपघातग्रस्त वाहनांची संख्याही मोठी आहे.

विवेक पाटील, पनवेल - गेल्या दहा वर्षांत पनवेल परिसरातून जाणार्‍या विविध मार्गांवर झालेल्या अपघातांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूप वाढले आहे. अपघातग्रस्त वाहनांची संख्याही मोठी आहे. अपघातांची बहुतांश प्रकरणे न्यायालयाच्या कक्षेत असल्याने संबंधित वाहने मूळ मालकांना देण्यात आलेली नाहीत. ती सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांकडे आता पुरेशी जागाही नाही. अनेक वर्षे मालकाच्या प्रतीक्षेत असलेली ही वाहने आता सडली आहेत. यातील काही वाहने अद्याप बर्‍यापैकी अवस्थेत असून ती ताब्यात घेण्यासाठी वाहनमालक न्यायालयाच्या आदेशाकडे डोळे लावून बसले आहेत. पनवेल परिसरातून मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, पनवेल-सायन हे महामार्ग जातात. या व्यतिरिक्त पनवेल-उरण यासारख्या राज्य महामार्गांची संख्याही बर्‍यापैकी आहे. ही वाहने पोलीस ठाण्यात आणली जातात किंवा वाहतूक चौकीच्या ठिकाणी उभी केली जातात. न्यायालयात जलदगतीने खटले निकाली निघत नसल्याने ही वाहने मालकांकडे वर्ग करता येत नाहीत. बेवारस किंवा चोरीच्या वाहनांप्रमाणे त्याची विल्हेवाट लावता येत नाही. परिणामी पनवेल विभागातील पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक मोडक्या आणि गंजलेल्या दुचाकी व चारचाकी उभ्या आहेत. ही वाहने ठेवण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी जागाही उपलब्ध नाही. दाटीवाटीने या गाड्या उभ्या करुन ठेवल्या आहेत. पावसात तर या दुचाकी सडल्या आहेत. पावसापासूनही या गाड्यांना संरक्षण नाही. चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांचे काही सुटे भाग चोरुन नेले आहेत. काही वाहनांमधील टायर, बॅटरी, आरसे, टेपरेकॉर्डर गायब झाले आहेत. न्यायालयातील दाव्यांबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने पोलिसांचाही नाईलाज आहे. निकाल लागल्यानंतर ही वाहने संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात येतील एवढेच सांगून पोलीस मोकळे होतात. त्यामुळे सडलेली ही वाहने भविष्यात दुरुस्त करुनसुद्धा पुन्हा वापरता येतील अशा परिस्थितीत राहिलेली नाहीत. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच या गाड्यांचे भवितव्य ठरणार असल्यामुळे या गाड्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. या गाड्यांमुळे कळंबोली, खारघर पोलीस ठाण्याच्या आवाराचे विदु्रपीकरण झाले आहे. दुचाकी, चारचाकींसोबतच मोडकळीस आलेले ट्रक, टेम्पो यासारखी मोठमोठी वाहनेही तेथे उभी आहेत. त्यामुळे परिसर बकाल होत असून त्यातूनच डासांचा उपद्रव वाढत आहे.