राजू काळे, भाईंदर
सहा महिन्यांपूर्वी अपघाती विम्याची मुदत संपल्याने अग्निशमन जवानांची सुरक्षा वा-यावर सोडली गेल्याचे वृत्त लोकमतच्या १८ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध होताच कर्मचारी संघटनेने प्रशासनाकडे सतत तगादा लावल्याने अखेर या जवानांना अपघातील विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेत मोडणा-या अग्निशमन दलातील जवानांवर बचाव कार्यादरम्यान जखमी होणे अथवा जिवीत हानीसारखा प्रसंग ओढावल्यास त्यांच्या वारसांना भरपाईच्या माध्यमातून अपघाती विम्याचे सुरक्षा कवच पुरवण्यात येते. ही हक्काची नुकसान भरपाई अपघातग्रस्त जवानांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरत असतो.
मीरा भाईंदर पालिकेच्या अग्नीशमन दलात सुमारे ९५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यातील ८२ कर्मचा-यांच्या अपघाती विम्याची मुदत २५ मे रोजीच संपुष्टात आल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
खरं म्हणजे या विम्याची मुदत संपण्याआधीच आस्थापना विभागाने त्यावर गांभीर्य दाखवून ती वेळेत लागू करणे अत्यावश्यक होते. परंतू, कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या कर्मचा-यांना विम्याचे सुरक्षा कवच लागू करण्यात आलेले नव्हते. एखादी दुर्घटना झाल्यास आपघातग्रस्त जवानाच्या आर्थिक सहाय्याच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण होऊ घातला होता. परंतु, तो आता लोकमतच्या वृत्ताने सुटला आहे.