Join us  

आमिर खान चुकून गेला भलत्याच बंगल्यात; जायचे होते ‘सागर’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:41 AM

आपण अशोक चव्हाण यांना भेटायला आलात का? अशी विचारणा केली.

- अतुल कुलकर्णी मुंबई : सिने अभिनेता आमिर खान गुरूवारी मलबार हिलवरील भलत्याच घरात गेला. चुकीच्या ठिकाणी आलोय, हे लक्षात आल्यानंतर त्याने सर्वांना नमस्कार केला. त्याला ज्या घरात जायचे होते त्याचा पत्ता विचारून घेतला आणि  तो त्याला हव्या त्या घरात शांतपणे निघून गेला...! 

त्याच्या ‘पिके’ चित्रपटातील ‘ये रॉंग नंबर हैं’ हा डायलॉग गाजला होता. पण खुद्द आमिरच्याच या ‘रॉंग नंबर’ची नंतर चर्चा रंगली. गुरूवारी सकाळी आमिर  खान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मलबार हिलवरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी येणार होता. फडणवीस यांच्या बंगल्याचे नाव ‘सागर’ आहे. त्यांच्या शेजारी माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे ‘मेघदूत’ हे शासकीय निवासस्थान आहे. आमिरच्या वाहनांचा ताफा चुकून थेट चव्हाण यांच्या बंगल्यात शिरला.अचानक वाहनांचा ताफा व अनेक सुरक्षा कर्मचारी बंगल्यात शिरल्याने तिथे उपस्थित कर्मचारी लगेच बाहेर आले.

ताफ्यातील पहिल्या वाहनातून खुद्द आमिर खान उतरला व तो घराच्या थेट मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील खुर्चीवर बसून बुटही काढू लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी अशोक चव्हाण बंगल्यावर उपस्थित नव्हते. शिवाय आमिर येणार अशी कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे सारेच कर्मचारी बुचकळ्यात पडले. शेवटी चव्हाण यांचे माध्यम समन्वयक अभिजित देशमुख यांनी आमिर यांचे स्वागत केले.

आपण अशोक चव्हाण यांना भेटायला आलात का? अशी विचारणा केली. त्यावेळी आमिरच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव उमटले. त्याने लगेच आपण फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचे सांगितले. परंतु, हे निवासस्थान फडणविसांचे नसून, चव्हाणांचे असल्याचे कळाल्यावर आमिर खानने विनम्र शैलीत अशोक चव्हाण यांची चौकशी केली.  ते घरी नसल्याने त्यांना नमस्कार कळवण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा बूट घातले व सगळ्यांना हात दाखवत चव्हाण यांचे निवासस्थान सोडले. 

टॅग्स :आमिर खान