Join us

पुराच्या छायेत ८० गावे

By admin | Updated: May 15, 2014 01:27 IST

पेण परिसरातील बाळगंगा, पाताळगंगा, भोगावती, अंबा या चार नद्या वाहत असून दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील गावांना पुराचा धोका उद्भवतो.

पेण : पेण परिसरातील बाळगंगा, पाताळगंगा, भोगावती, अंबा या चार नद्या वाहत असून दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील गावांना पुराचा धोका उद्भवतो. नदी प्रवाहाच्या धोकादायक पूररेषेवर पेणच्या नदीकाठची ३७ गावे तर खाडी किनारची ४३ गावे अशी ८० गावे पावसाळी पूरपरिस्थितीच्या डेंजर झोनमध्ये आहेत. १९८९ चा महापूर व २००५ च्या २४ जुलैच्या अतिवृष्टीने उडालेला हाहाकार, तो थरार पेणसह सबंध रायगडवासीयांच्या स्मरणात कायम आहे. पेण शहरात थेट भोगावती नदीच्या प्रवाहाचा रोख असल्याने शहराच्या निम्म्या भागात आपत्ती काळात तारांबळ उडते. तसेच या पाण्याचा प्रवाह अंतोरा खाडीमार्गे कणे, सापोली, वाघणबेडी, कळवा, मोठे वढाव, काळेश्रीमागे धरमतरखाडीला मिळते. त्यामुळे या वरील १० गावे बाधित क्षेत्रात येतात. दुसरीकडे बाळगंगा व पाताळगंगा नद्यांचा प्रवाह रावे कोपर खाडीत येवून येथील परिसरात तुंबतो. त्याचा फटका कोपर, हनुमानपाडा, तांबडशेत जोहे, वरेडी या गावांना बसतो. या दोन्ही नद्यांच्या काठावरची १३ गावे पूरप्रवण क्षेत्रात येतात. येथील दादर, सोनखार, उर्णोली, या गावांना अतिवृष्टी व उधाणभरती असा दुहेरी संकटाचा सामना नेहमीच करावा लागतो. अंबा नदीचा प्रवाह कोलेटी, निगडे, जुईअब्बास, खारपले, गडब, वडखळ, डोलवी या धरमतर खाडी किनारी गावांना मोठा फटका देतो. त्यामुळे वडखळच्या खालच्या बाजूकडील ठिकाणी समुद्रभरती व पूरपरिस्थितीबाबत सतर्कता बाळगून असतात. पेणमध्ये गतवर्षी मान्सूनची सरासरी शंभर टक्क्यापेक्षा अधिक होती. तब्बल ४२०० मिमी पाऊस पडला. मात्र प्रत्येक नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाली नाही. यामुळे गतवर्षी पुराचा प्रसंग उद्भवला नव्हता. मात्र मान्सूनचा तडाखा व अतिवृष्टी झालीच तर पेणची हेटवणे, आंबेघर, शहापाडा ही तीन धरणे ओव्हरफ्लो होतात. धरणांच्या सुरक्षेचे कारण दाखवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास, सांडव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचा पाणी, नद्यांची धोकादायक पातळी व समुद्राची उधाणभरती यामुळे परिस्थिती धोकादायक ठरून पेणची ८० गावे पूरप्रवण क्षेत्रात कायम राहतात. पेण तहसीलदार यांनी याबाबत आढावा बैठक घेवून आपत्ती यंत्रणेला सतर्क केले आहे. आपत्ती काळात नगरपालिका मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी मुख्य संपर्क ठेवून त्याबाबतची माहिती तलाठी, ग्रामसेवक, न.पा. कर्मचारी व शासनाचे इतर विभाग यांच्याकडून माहिती घेवून तहसीलदार व प्रांताधिकारी यांना माहिती देतील, यंत्रणेला आपत्कालीन आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)