उरण : उरणच्या जासई ते गव्हाणफाटा या भागातून शेतकऱ्यांच्या शेतीतून गेलेल्या एमआयडीसीच्या पाईपलाईचे भुईभाडे म्हणून सात वर्षांच्या लढाईनंतर ४६ लाख ७५ हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. शासनाचे यापूर्वी दिले जाणारे लमसमचे गुंठ्याला केवळ शंभर रुपयांचे भुईभाडे नाकारुन येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावरची आणि कागदोपत्री लढाई गेली सात वर्षे लढले. त्याचा लाभ म्हणून कालच एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता पी.डी. चव्हाण यांच्या हस्ते शेतकऱ्यांना भुईभाड्यापोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी संयमाने आणि शांततेच्या मार्गाने कायदेशीर लढाई लढल्यास उशिर जरुर लागतो मात्र न्याय नक्की मिळतो, असा विश्वास या लढ्याचे उभरते नेतृत्व सुरेश काशिनाथ पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांना पाणी वाहून नेण्याच्या पाईपलाईन उरणच्या जासई भागातील दास्तानफाटा ते गव्हाणफाटा या परिसरातून ६६ शेतकऱ्यांच्या शेतातून टाकण्याय आली होती. या पाईपलाईच्या निमित्ताने केवळ गुंठ्याला शंभर रुपये याप्रकाणे शेतकऱ्यांना भुईभाडे दिले जात होते. अत्यंत तुटपुंज्या भुईभाड्यावर आपल्या शेतातून ही पाईपलाईन जाऊ दिल्याने शेतकऱ्यांनी ना आपल्या शेतात काही विकासाचा प्रकल्प राबवता येत होता ना त्याची विक्री करता येत होती. अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी २००७ पासून या अपुऱ्या भुईभाड्याच्या विरोधात आपली लढाई सुरु केली होती. कधी रास्ता रोको तर कधी निदर्शने, उपोषणे अशी हत्यारे उपसत जासई परिसरातील जासई, एकटघर, रांजणपाडा, बेलपाडा, चिर्ले आदी गावांतील शेतकरी गेली सात वर्षे अगदी नेटाने लढले आणि या लढाईतूनच शासनाच्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे देय नुकसान भरपाई आपल्या पदरात पाडून घेतली आणि सात वर्षांच्या लढाईला यश आले.(वार्ताहर)
६६ शेतक-यांना मोबदला
By admin | Updated: December 20, 2014 01:17 IST