यदु जोशी, मुंबईपरळ येथील टाटा कॅन्सर इस्पितळात येणाऱ्या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी माहुल, वडाळा येथील एसआरएच्या दोन इमारतींमधील ४०० सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीबाधितांसाठी या दोन इमारती बांधण्यात आल्या होत्या. मात्र विविध वादांमुळे त्या ठिकाणी कोणीही राहायला गेले नाही. रिकाम्या असलेल्या या इमारती टाटा इस्पितळात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिला होता. टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक, एसआरएचे अधिकारी आणि आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी यासंदर्भात बैठकही घेतली होती. तसेच इस्पितळाला भेट देऊन तेथील अधिकारी व रुग्णांशी चर्चादेखील केली होती. या दोन्ही इमारती टाटा कॅन्सर इस्पितळाकडे सोपविण्यात येतील. त्या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या तसेच या इस्पितळातील निवासी डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे. रुग्णांकडून अत्यंत नाममात्र भाडे आकारले जाईल. उपचाराच्या काळात त्यांना या ठिकाणी जवळच्या नातेवाइकासह राहता येईल. या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर एका डॉक्टरच्या राहण्याची व्यवस्था असेल. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना स्वयंपाकाचा गॅस मोफत उपलब्ध करुन दिला जाईल तसेच, दोन्ही इमारतींमध्ये किराणा दुकाने असतील. रुग्णांना उपचारासाठी कधीकधी सहा-सहा महिने मुंबईत राहावे लागते कारण अधुनमधून उपचारासाठी येणे त्यांना परवडत नाही. म्हणून त्यांच्या मुलांसाठी बालवाडीही सुरू करण्यात येणार आहे. इमारतींची देखभाल आणि इतर संचालनाची जबाबदारी टाटा कॅन्सर इस्पितळ स्वीकारेल. केंद्रीय अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारित हे इस्पितळ येते आणि त्याला केंद्र सरकारचे अनुदान मिळते. सूत्रांनी सांगितले की अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ते लंडन दौऱ्यावरून परत आल्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
‘टाटा’च्या कर्करुग्णांसाठी ४०० सदनिका
By admin | Updated: November 12, 2015 03:03 IST