वसई : महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १११ जागांसाठी एकूण ३७९ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी ३२७ उमेदवारांनी माघार घेतली. चार प्रभागामध्ये बविआचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण ७४७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ३६ उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान रद्द झालेत. सोमवारी अनेकांनी माघार घेतल्याने प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही प्रभागामध्ये दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती होणार आहेत. सोमवारी राजकीय क्षितीजावर अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राज्यस्तरावर असलेल्या भाजप-सेना व रिपाइं अशा महायुतीला वसई विरारमध्ये झटका बसला. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी काही दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर बहुजन विकास आघाडी व रिपाइं आठवले गट यामध्ये समझोता झाला. बहुजन विकास आघाडीने काही जागा रिपाइंसाठी सोडल्या. यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. रिपाइंने पाठींबा देऊ केल्यामुळे बहुजन विकास आघाडीला दलित मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे.
३२७ जणांची माघार
By admin | Updated: June 2, 2015 22:57 IST