Join us  

2500 मेगावॅट क्षमतेचे सौर औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार - ऊर्जामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:12 PM

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड‍शेडिंग होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई : येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड‍शेडिंग होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनाची परिस्थिती उद्भवते. हे भारनियमन टाळण्यासाठी आणि विजेचे योग्य नियोजन करण्यासाठी ऊर्जामंत्री यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत संचांची कार्यक्षमता वाढवून अधिक वीज निर्मिती करण्याचे आदेश दिले.मधल्या काळात कोळश्याच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात भारनियमची परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पावले उचलत बैठकीचे आयोजन केले होते. वीज निर्मिती केंद्रांना कोळश्याचा तुटवडा होऊ नये म्हणून दररोज 35 रैक कोळसा वीज निर्मिती केंद्राना पुरवला जाईल. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून साडेसात हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली.सौरऊर्जा स्वस्त व शाश्वत असल्यामुळे येणाऱ्या काळात पारंपरिक ऊर्जेला चांगला पर्याय उपलब्ध होईल या दृष्टीने औष्णिक संचासोबत सोलर संच ही लवकरच उभारले जातील. महानिर्मिती कंपनीकडील उपलब्ध असलेल्या जमिनींवर 2500 मेगावॉट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत असेही ऊर्जामंत्री यावेळी म्हाणाले.