Join us  

अग्निदुर्घटनेत १७९ जणांचे बळी; दरवर्षी सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 1:38 AM

गेल्याच आठवड्यात जीएसटी भवन आणि अंधेरी एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली होती. अशा विविध दुर्घटनांमध्ये वर्षभरात १७९ जणांचा मृत्यू झाला आहे

मुंबई : मुंबईतील धकाधकीच्या जीवनात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दरवर्षी सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना घडत आहेत. गेल्याच आठवड्यात जीएसटी भवन आणि अंधेरी एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली होती. अशा विविध दुर्घटनांमध्ये वर्षभरात १७९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७२२ नागरिक जखमी झाले आहेत़ त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंबईत विविध प्रकारच्या दुर्घटना दररोज घडत असतात़ यामध्ये झाड पडणे, संरक्षक भिंत पडणे, आग लागणे अशा घटनांचा प्रमुख्याने समावेश आहे़ मोठ्या आगींचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येत आहे़ सन २०१९ मध्ये मुंबईत तब्बल १३,१५० दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. अशा दुर्घटनांमध्ये मदतकार्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते़ मात्र दीड कोटी लोकसंख्येपुढे जवानांची संख्या अत्यल्प आहे़पावसाळ्यात दुर्घटनांचे प्रमाण अधिक असते़ यामध्ये वृक्ष कोसळणे, घर कोसळणे, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅस गळती होऊन सिलिंडर स्फोट तसेच नाले, मॅनहोल, नदी, समुद्र-खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावर अपघात अशा दुर्घटना घडत असतात़ यामध्ये शॉर्टसर्किटमुळे पाच हजार २५४ ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली कार्यकर्ते शकिल अहमद यांना मिळाली आहे़आगीच्या घटना : पाच हजार २५४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या़ यामध्ये ३८ लोकांचा मृत्यू तर २१६ नागरिक जखमी झाले आहेत.घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या एक हजार तीन दुर्घटना - ५७ जणांचा मृत्यू तर २९९ लोक जखमी झाले आहेत.झाडे, झाडांच्या फांद्या पडणे - चार हजार ९३७ दुर्घटनांची नोंद झाली आहे. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४२ लोक जखमी झाले आहेत.समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडण्याच्या १२८ दुर्घटनांची नोंद झाली आहे़ त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमीझाले आहेत.