ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ४२ गटासाठी छाननीअंती १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समित्यांच्या ११० पैकी ८२ गणांसाठी ३३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थासाठी ७७१ अर्ज दाखल झाले असता यातून छाननीमध्ये ३९७ बाद झाले असून उर्वरित ४७४ अर्ज शिल्लक आहेत. यात शहापूरची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती़यावरून गटांतील २९४ अर्जांपैकी १५६ अर्ज बाद झाले आहेत. तर गणांतील ४७७ अर्जांपैकी १४१ अर्ज छाननीमध्ये बाद झाले असून गट व गणांत मिळून ४७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी १९ जानेवारीला किती जणांकडून माघार घेतली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुरबाड तालुक्यातील जि. प. च्या चार गटांसाठी ७२ अर्ज आले असता त्यातून दहा अर्ज बाद झाले असून उर्वरित ६२ अर्ज शिल्लक आहेत. याप्रमाणेच या तालुक्यातील आठ गणांसाठी दाखल १३४ उमेदवारी अर्जापैकी १२ अर्ज बाद होऊन आता १२२ अर्ज शिल्लक राहिले आहेत. भिवंडी तालुक्यातील जि. प.च्या १३ गटांसाठी ११५ अर्ज दाखल झाले असता त्यापैकी १० अर्ज बाद ठरवून १०५ अर्ज शिल्लक राहिले आहेत. आता १२१ अर्ज शिल्लक आहेत. अंबरनाथ तालुक्यातील सहा गटांसाठी २४ अर्ज आले असून त्यातून १० अर्ज बाद झाले असता १४ अर्ज शिल्लक आहेत. तर या तालुक्याच्या पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ४१ अर्ज आले असता त्यातील १४ अर्ज बाद झाले असता उर्वरित २७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. छाननीत अवैध ठरवल्यास त्या विरोधात संबंधीताना १७ जानेवारीपर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गटात १५६; गणात १४१ अर्ज बाद
By admin | Updated: January 14, 2015 23:11 IST