वसई : विरार पूर्वेस कसराळी येथे उघाडीचे दरवाजे बंद न केल्यामुळे या भागातील जमीन नापीक होऊन अनेक शेतक-यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. दरवर्षी या शेतीमध्ये खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान होत असल्याने आॅक्टोबर महिन्याच्या मध्यास हे उघाडीचे दरवाजे बंद करण्यात येतात. यंदा ते अद्याप बंद न केल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे.कसराळी येथील विभाग क्रमांक ४ च्या २ उघाडीतून समुद्राच्या भरतीचे खारे पाणी गावातील शेतीमध्ये शिरले. परिणामी, येथील शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. गेल्या ४ वर्षापासून येथील स्थानिक शेतकरी याबाबत सातत्याने तक्रारी करत आहेत. परंतु या संदर्भात स्थानिक खारभूमी विकास कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कसराळी, दहिसर, जांभुळपाडा, खार्डी, डोलीव, फणसपाडा, तलावपाडा व कोशिंबे गावातील सुमारे १५० हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी होऊनही हे दरवाजे बंद केले जात नाहीत. भविष्यात या सर्व गावातील शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कंत्राटदार व खारभूमी विकास अधिकारी यांच्यातील वादामुळे ही कामे वेळेवर होत नसल्याची सर्वत्र चर्चा आहे. (प्रतिनिधी)
१५० हेक्टर शेतजमीन नापीक
By admin | Updated: December 19, 2014 23:18 IST