मोखाडा : या तालुक्यात निर्माण झालेली अकरावी प्रवेशाची समस्या तातडीने सोडवू, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली. युथ फोर पिल्स मुंबई व आरोहण यांनी आयोजिलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री वाटप करण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते. दरवर्षीच वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवला जातो. परंतु या वर्षी मात्र १ लाख वह्या वाटप केल्या जाणार आहे. शनिवारी कला वाणिज्य महाविद्याल मोखाडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आदिवासी विकासमंत्री यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. संपूर्ण जिल्ह्यात ११ वी च्या प्रवेशाचा प्रश्न जटील झाला असून तो सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. येथील आदीवासी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळा कॉलेजात प्रवेश मिळवून दिला जाणार असल्याचे व त्यांचा खर्च आदिवासी विभाग करणार आहे त्यांनी सांगितले तसेच २ हजार ८३५ ग्रामपंचायतींसाठी केलेल्या तरतूदीच्या ५ टक्के निधी म्हणजे ९ ते १० लाख रुपये ग्रामपंचायतीला विकास निधी म्हणून वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोखाडा शहराचा पाणीप्रश्न सोडवून संपूर्ण तालुकाच टँकरमुक्त करावा, अशी मागणी करून पालघर जि. प. सदस्य प्रकाश निकम यांनी येथील समस्या सोडविण्याचे साकडे मंत्रीमहोदयांकडे घातले. यावेळी व्यासपीठावर आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा खासदार चिंतामण वनगा, जि.प. अध्यक्ष सुरेखा थेतले, अॅड. देविदास पाटील, सभापती सारीका निकम, उपसभापती मधुकर डामसे, तहसिलदार बीडीओ आदी मान्यवर उपस्थित होते. ही संस्था दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम आयोजित असते.(वार्ताहर)
अकरावी प्रवेशाची समस्या सोडविणार!
By admin | Updated: July 4, 2015 23:25 IST