मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत भायखळ्यात उभ्या राहिलेल्या अबोली बिग या इमारतीमधील तब्बल ११ घुसखोरांना महापालिकेने अभय दिले आहे. या घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे सूचनापत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने महापालिकेला पाठविले असून, या पत्रालाही पालिकेने केराची टोपली दाखविली.भायखळा येथील बकरीअड्ड्यालगतच्या झोपड्यांची २००९ सालादरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत इमारत उभी करण्यात आली. प्रत्यक्षात त्यानंतर या इमारतीमध्ये अधिकृत रहिवाशांसह घुसखोरांनीही बस्तान बसविले. २००९ सालापासून आजतागायत येथे अनधिकृतरीत्या वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी, म्हणून संतोष लोखंडे यांनी प्राधिकरणाकडे वारंवार तक्रार केली. त्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये घुसखोरांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने महापालिकेला सूचनापत्र पाठविले. शिवाय मनुष्यबळ नसल्याने पालिकेने घुसखोरांवर कारवाई करावी आणि सदनिकांच्या किल्ल्या प्राधिकरणाकडे सुपुर्द कराव्यात, असे म्हटले.प्राधिकरणाच्या सूचनापत्राला सहा महिने उलटून गेले तरी अद्याप महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. यासाठी तक्रारकर्त्याने ‘ई’ वॉर्डकडे कारवाईसाठी तगादा लावला. प्रत्यक्षात पालिकेकडून काहीच कारवाई होत नसल्याने प्राधिकरणानेच लक्ष घालावे, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेचे झोपू योजनेतील ११ घुसखोरांना अभय
By admin | Updated: July 6, 2015 03:08 IST