Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ‘क्यार’ वादळाचा धोका टळला; पण अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:44 IST

अनेक ठिकाणी पडझड; पूरस्थिती आणि वाहतुकीचीही कोंडी 

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले ‘क्यार’ वादळ अखेर घोंघावत किनारपट्टीपासून नेमक्या उलट्या दिशेने पश्चिमेकडे वेगाने सरकत असून यामुळे किनारपट्टीवरील वादळाचा धोका टळला. मात्र अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे झालेली पडझड यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. नद्या, नाल्यांची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. वाहनांची कोंडी होऊन रस्ते तुंबण्याचे प्रकारही घडले. 

हवामान वेधशाळेने समुद्रातील क्यार वादळाचा परिणाम म्हणून पुढील २४ तास राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार यांनी किनारपट्टीला वादळाचा धोका टळला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, समुद्रात कमी दाबाच्या पट्टयाचे पहाटे तीव्र वादळात रुपांतर झाले. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. परंतु पावसाची तीव्रता मात्र २४ तास कायम राहील. पुढील बारा तासात किनाऱ्यावर ताशी ५५ ते ६५ किलोमिटर वेगाने वारे वाहील आणि वाऱ्याचा वेग ताशी ७५ किमीपर्यंत पोहचू शकतो. नंतर वातावरण निवळणार असून पर्यटक २७ नंतर गोव्याला भेट देऊ शकतात.’ समुद्र प्रचंड खवळलेला असेल व त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. 

नद्या, नाल्यांची पातळी वाढली 
गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले. शुक्र वारी दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटून येत होते आणि मोठ्या थेंबाचा पाऊस कोसळत होता. सकाळी तर सर्वत्र अंधार दाटल्यासारखी स्थिती होती. रात्रभर अखंडपणे कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांची पाण्याची पातळी वाढली. चोडण, दिवाडी येथे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.