Join us

इनअॅक्टिव्ह मोबाइल नंबर बँक अकाऊंटशी लिंक आहे? तर लवकरच बंद होईल UPI पेमेंट; वाचण्यासाठी 'हे' करा काम

By जयदीप दाभोळकर | Updated: March 20, 2025 15:03 IST

देशातील बहुतांश लोकांनी आता यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करण्यास सुरुवात केलीये. यामुळे आपलं जगणं अगदी सोपं झालंय, पण त्याचवेळी सायबर क्राईमच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे.

आजकाल ऑनलाइन पेमेंट खूप सामान्य बाब झाली आहे. देशातील बहुतांश लोकांनी आता यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करण्यास सुरुवात केलीये. यामुळे आपलं जगणं अगदी सोपं झालंय, पण त्याचवेळी सायबर क्राईमच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. सायबर गुंड अगदी सहजपणे लोकांची बँक फसवणूक करून गुन्हे करत आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयनं १ एप्रिल २०२५ पासून नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया.

१ एप्रिलपासून लागू होणार नियम

१ एप्रिलपासून एनपीसीआयनं नियमात बदल केलाय. हा नियम यूपीआय, गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्ससाठी आहे. एनपीसीआयच्या नव्या नियमानुसार १ एप्रिलपासून यूपीआयशी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक खात्यातून काढून टाकले जातील, जे मोबाईल नंबर बऱ्याच दिवसांपासून अॅक्टिव्ह नाहीत. अशा तऱ्हेनं जर तुमच्याकडेही बराच काळ बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर असेल आणि तो अॅक्टिव्ह नसेल तर १ एप्रिलपासून तुमचा नंबरही काढून टाकला जाईल, ज्यामुळे तुमची यूपीआय सेवा बंद होऊ शकते.

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, बँक खात्याशी जोडलेले जे मोबाइल क्रमांक बर् याच काळापासून बंद आहेत, ज्यामुळे बँकिंग आणि यूपीआय प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. याशिवाय टेलिकॉम ऑपरेटरनं हे नंबर दुसऱ्याच्या नावानं जारी केल्यास फसवणुकीचा धोका वाढू शकतो.

... तर करा हे काम

जर तुमच्याकडेही असा नंबर असेल जो बराच काळ अॅक्टिव्ह नसेल आणि तो तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा नंबर अॅक्टिव्हेट करावा किंवा तुम्ही तुमचा नवीन नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करावा. यामुळे तुमचं नुकसानही होणार नाही.

टॅग्स :पैसा