Join us

तुमची वृत्ती ठरवेल तुमच्या कर्जाची पत!

By admin | Updated: May 30, 2015 00:03 IST

नियोजित तारखेच्या आत तुम्ही जर ते भरत नसाल किंवा एकापेक्षा जास्त बिले थकलेले असेल तर तुम्हाला यापुढे दुसरे कर्ज मिळणे कटकटीचे होणार आहे.

मनोज गडनीस ल्ल मुंबईमोबाईल बिल, क्रेडिट कार्ड किंवा घराचे अथवा वाहनाचे हप्ते तुम्ही वेळेवर भरता का?, नियोजित तारखेच्या आत तुम्ही जर ते भरत नसाल किंवा एकापेक्षा जास्त बिले थकलेले असेल तर तुम्हाला यापुढे दुसरे कर्ज मिळणे कटकटीचे होणार आहे. कारण, तुमच्याकडून बिल भरणा अथवा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी होणारा विलंब यातून तुमची ‘प्रवृत्ती’ प्रतिबिंबित होते असा निष्कर्ष बँका अथवा वित्तीय संस्था काढू शकतात व यामुळेच तुम्हाला कर्ज नाकारले जाऊ शकते. थकीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर उपाययोजना करण्यासंदर्भात एक समिती तयार केली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून सध्या थकीत असलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत भाष्य करतानाच नवीन थकीत कर्ज तयार होऊ नये, किंवा कर्जाची प्रक्रियाच नव्याने मांडण्याचे सुतोवाच केले आहे. यानुसार, कर्जाच्या पात्रता निकषात बसणारे सर्व कागदपत्र तुमच्या हातात असले तरी, जर तुम्ही तुमच्या विविध बिलांचा भरणा करण्यात विलंब केला असेल किंवा अन्य एखादे कर्ज विलंबाने फेडले असेल तर त्याचा विचार नव्या कर्जाच्या मंजुरीमध्ये केला जाणार आहे. सुमारे ४५ विविध असे मुद्दे विचारात घेऊन त्याद्वारे कर्जाला मंजुरी मिळणार आहे. कर्जदाराची सांपत्तिक स्थिती, कर्ज फेडण्याची क्षमता, त्याच्या मालमत्ता आणि त्याकरिता गॅरेंटी राहणारे लोक याचसोबत सिबिलसारख्या संस्थेच्या माध्यमातून संबंधित कर्जदाराच्या नावे असलेली चालू अथवा भूतकाळातील कर्ज, त्यांची परतफेड आदी बाबी विचारात घेतल्या जातात; परंतु आता मोबाईल, वीज बिल, क्रेडिट कार्ड अशा कोणत्याही बाबींसाठी पॅन कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. पॅन कार्डाची प्रणाली संगणकीय असल्याने संबंधित व्यक्तीचे अन्य आर्थिक व्यवहार तपासणे आणि त्याच्या सर्व माहितीचा ट्रॅक ठेवणे सिबिलला सोपे जाते. च्सिबिलच्या माध्यमातून आजवर केवळ संबंधित कर्जदाराची चालू अथवा भूतकाळातील कर्जाची माहिती घेण्यासोबतच आता, या अन्य आस्थापनांतील वित्तीय व्यवहारांची स्थिती देखील तपासली जाईल व याच आधारे संबंधित व्यक्तीला वित्तीय व्यवहारांची शिस्त आहे का, किंवा त्याची वित्तीय वर्तणूक कशी आहे, याचा लेखाजोखा मांडून मगच कर्जाची मंजुरी दिली जाईल. थोडक्यात, सांगायचे तर, विनासायास कर्ज मिळविण्यासाठी यापुढे सर्वांनाच मोबाईल असो, वीज बिल असो किंवा क्रेडिट कार्ड किंवा अन्य काही त्यांचा भरणा वेळेवरच करणे आवश्यक ठरणार आहे.