अकोला : यावर्षी विदर्भात सात ते दहा लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बीटी कापूस कंपन्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांना अधिक बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता शेतकऱ्यांत वर्तविण्यात येत आहे. राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाचे क्षेत्र प्रचंड घसरले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी करून, सोयाबीन पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत सोयाबीनचा पेरा राज्यात ३१.६२ लाख हेक्टरपर्यंत पोहोेचला आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक १८ ते २० लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. विदर्भात २२ लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले आहे. दरम्यान, २०१३ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि २०१४ मधील अल्प पावसाचा सोयाबीन पिकाला जबर फटका बसला असून, हंगामाच्या काळात आलेला अवकाळी पाऊस, गारपिटीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रमाणित सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने बियाणे उलटले. त्यामुळे शेतकऱ्यांना गत खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागली.यंदाही तीच परिस्थिती असल्याने शेतकरी कापसाचे नियोजन करताना दिसतो आहे. त्यामुळे यंदा कापसाचे क्षेत्र सात ते दहा लाख हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे; पण मान्सून कसा असेल, यावर सर्व अंवलबून असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
यंदा कपाशीखालील क्षेत्र वाढणार !
By admin | Updated: March 8, 2015 23:22 IST