Join us

बदलीच्या ठिकाणी हजर झाले का?

By admin | Updated: November 4, 2014 00:11 IST

सीईओंचे कर्मचार्‍यांना फर्मान

सीईओंचे कर्मचार्‍यांना फर्माननाशिक : दोन महिन्यांपूर्वी शासन नियमानुसार कर्मचार्‍यांचे विभाग व टेबल बदलण्याची कार्यवाही केलेले काही मातब्बर कर्मचारी केवळ स्वाक्षरीपुरतेच बदलीच्या जागी जात असल्याची कुणकुण लागताच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बदली झालेल्या सर्वच कर्मचार्‍यांकडून लेखी स्वरूपात त्याबाबत खुलासा मागविल्याचे वृत्त आहे.विभाग आणि टेबल यांच्यात खांदेपालट करूनही काही कर्मचारी बदली झालेल्या विभागात स्वाक्षरी करून नंतर मूळ विभागातच काम करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांमध्ये होती. काही प्रामाणिक कर्मचार्‍यांनी मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आदेश दिल्यानंतर लगेचच बदललेल्या जागी रुजू होऊन कामकाजास सुरुवात केली, तर काही कर्मचार्‍यांना विभाग सोडवत नसल्याने नवीन कर्मचार्‍याला कामाची माहिती होईपर्यंत आपण त्यांना मदत करीत आहोत, अशा आविर्भावात पहिल्या जागीच हे कर्मचारी कामकाज करीत असल्याचे कळते. कर्मचार्‍यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होताच याची कुणकुण मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना लागली. त्यांनी प्रशासनाला अशा बदली झालेल्या कर्मचार्‍यांची यादी व त्यांच्याकडून बदलीच्या जागी रुजू झाल्याबाबत तसेच बदलीच्या जागी रुजू न झाल्यास त्याचे कारण आदि माहिती मागविल्याचे कळते. तसेच संबंधित खातेप्रमुखांकडूनही याबाबत महिन्यापूर्वीच माहिती मागविल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)