Join us  

"ऊर्जित पटेल यांनी मोदी सरकारबरोबर काम करावे अन्यथा राजीनामा द्यावा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 10:51 AM

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वादात आता संघप्रणीत संघटनेनं उडी घेतली आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वादात आता संघप्रणीत संघटनेनं उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत असलेल्या स्वदेशी जागरण मंचानं आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मोदी सरकारबरोबर काम करावं अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा, असं  स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले आहेत.तसेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांबरोबरच इतर अधिकाऱ्यांनी सरकारविरोधात सार्वजनिकरीत्या बोलण्याचं टाळलं पाहिजे. तुमचे सरकारशी मतभेद असल्यास ते सार्वजनिकरीत्या नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळांच्या बैठकीत त्यावर आवाज उठवला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयचे उपगव्हर्नर वीरल आचार्य यांनी बँकांच्या स्वायत्ततेसंबंधी मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय बँकेच्या कामकाजात ढवळाढवळ करणं हे विनाशकारी ठरू शकतं, असं ते म्हणाले होते. त्यानंतर ऊर्जित पटेल राजीनामा देतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. परंतु सरकारनं यावर स्पष्टीकरण देऊन वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली होती. तसेच आरबीआयच्या कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करणं थांबवावं, असंही पत्रात म्हटलं होतं.जर तुम्ही आरबीआयच्या कामातील ढवळाढवळ बंद केली नाही, तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहा, असा इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दिला होता. सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख होता. आरबीआयचे उप गव्हर्नर वीरल आचार्य यांनीही कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक