नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारतात हायस्पीड मोबाईल डेटा सेवा सुरू होऊन दोन वर्षांपेक्षाही जास्त काळ होऊनही केवळ १३ टक्के ग्राहकच थ्री आणि फोर जी नेटवर्कचा वापर करीत असल्याचे फेसबुकच्या अहवालात म्हटले आहे.यासाठी फेसबुकच्या पुढाकाराने इंटरनेट डॉट ओआरजीने पाहणी केली होती. जगात इंटरनेटचे जाळे विस्तारण्यासाठी इंटरनेट डॉट ओआरजीची स्थापना झाली आहे. ओआरजीच्या अहवालानुसार भारत मोबाईल डेटा वापरात अगदी खालच्या पायरीवर उभा आहे. सिस्कोच्या २०१४ व्हीएनआय मोबाईल फोरकास्टच्या आधारावर भारत जागतिक वापराचा विचार केला तर खालच्या पायरीवर म्हणजे येथे मोबाईल ग्राहकांचा सरासरी डेटा वापर दरमहा १४९ एमबी आहे. हा अहवाल म्हणतो की इंटरनेट ग्राहकांमधील अगदी वरच्या २० टक्क्यांमधून ८५ टक्के वाहतूक येते, तर उर्वरित ८० टक्के ग्राहकांचा इंटरनेटचा दरमहा सरासरी वापर ३० एमबीपेक्षाही कमी आहे. १३ टक्के भारतीय कनेक्शन्स थ्री जी व फोर जी नेटवर्कवरील आणि १५.३ टक्के कनेक्शन्स स्मार्टफोनवरील आहेत.दूरसंचार नियामक ट्रायने दिलेल्या माहितीनुसार मोबाईल उपकरण वापरणाऱ्या विभागात ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या डिसेंबर २०१४ मध्ये ६.९९ कोटी, तर या कालावधीत मोबाईल ग्राहकांची संख्या ९४.३९ कोटी होती. विशेष म्हणजे भारतात मोबाईल डेटा शुल्क जगात सगळ्यात कमी आहे.
१३ टक्के ग्राहकांकडेच थ्री जी, फोर जी नेटवर्क
By admin | Updated: February 26, 2015 00:21 IST