हरीश गुप्ता, नवी दिल्ली रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वारसदाराची निवड करण्यासाठी कोणत्याही समितीची स्थापना केली जाणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नव्या गव्हर्नरची घोषणा वेळेपूर्वीच केली जाईल. त्याबाबत आम्हाला कोणतेही तर्कवितर्क नको आहेत. निवडीची प्रक्रिया याआधीच सुरू करण्यात आली असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सोमवारी सांगितले. राजन यांनी आपल्याला दुसरी टर्म नको असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले आहे. त्यांची कारकीर्द ४ सप्टेंबर रोजी संपत आहे. राजन यांनी कार्यकाळ पूर्ण करताच अध्यापनाकडे वळणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला होता. सरकारसोबत पूर्ण सल्लामसलत केल्यानंतर मी गव्हर्नरपदाची कारकीर्द संपुष्टात येताच अध्यापनाकडे वळण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो असे राजन यांनी आरबीआयच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक पोस्टवर राजन यांच्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली होती. (वृत्तसंस्था)
राजन यांचा वारसदार ठरवण्यासाठी समिती नाही
By admin | Updated: June 21, 2016 07:41 IST