Join us

ट्रायची दूरसंचार कंपन्यांशी चर्चा

By admin | Updated: September 10, 2016 05:53 IST

रिलायन्स जिओविरुद्ध अन्य दूरसंचार कंपन्यांतील झगड्याचा निपटारा करण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने शुक्रवारी या कंपन्यांशी चर्चा केली

नवी दिल्ली : आंतरजोडण्या देण्याच्या मुद्यावरून रिलायन्स जिओविरुद्ध अन्य दूरसंचार कंपन्यांतील झगड्याचा निपटारा करण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने शुक्रवारी या कंपन्यांशी चर्चा केली. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची संघटना सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाला (सीओएआय) मात्र या चर्चेत सहभागी केले गेले नाही.रिलायन्स जिओव्यतिरिक्त भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांचे प्रतिनिधी चर्चेला उपस्थित होते. जिओचे संचालक मंडळ सदस्य महेंद्र नहाटा यांनी तासाभराच्या चर्चेनंतर पत्रकारांना सांगितले की, आम्ही केवळ रिलायन्स जिओ अथवा एअरटेल किंवा व्होडाफोनच्या ग्राहकांची नव्हे, तर भारतीय ग्राहकांची लढाई लढत आहोत. आम्ही योग्य प्रमाणात जोडण्या आणि आंतरजोडण्या देण्याची मागणी करीत आहोत. आम्ही ट्रायसमोर आमची बाजू मांडली. त्यावर निर्णय देण्याची जबाबदारी आता ट्रायची आहे. ट्रायने कोणतीही निश्चित कालमर्यादा यासाठी दिलेली नाही. मोबाईलवरून जेव्हा एखादा क्रमांक डायल केला जातो, तेव्हा तो त्याच्याशी संपर्क करून आंतरजोडणी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. या क्षेत्रात रिलायन्स जिओ नवी कंपनी आहे. इतर कंपन्या आपल्याला आंतरजोडणी देत नसल्याचा आरोप जिओने केला आहे. जिओने मोबाईल इंटरनेटच्या क्षेत्रात जगातील सर्वाधिक स्वस्त सेवा जाहीर केली आहे, तसेच मोबाईल कॉल मोफत केला आहे. जिओची ही योजना अन्य कंपन्यांचे कंबरडेच मोडू शकते. या पार्श्वभूमीवर अन्य कंपन्यांवर जिओने आंतरजोडण्या दिल्या जात नसल्याचा आरोप केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>निमंत्रणाचा वादसीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यूज म्हणाले की, रिलायन्सच्या सांगण्यावरूनच आमच्या संघटनेला बैठकीत प्रवेश दिला नाही. जिओचे संचालक मंडळ सदस्य महेंद्र नहाटा यांनी सांगितले की, आम्ही असे काहीही कोणाला सांगितलेले नाही. ज्यांना बैठकीचे निमंत्रण आहे, त्यांनी यावे.