नवी दिल्ली : संघटित क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान एक हजार रुपये पेन्शन देण्याची योजना स्थगित करण्यात आल्याने जवळपास ३२ लाख पेन्शनधारकांना कमी पेन्शनवरच समाधान मानावे लागणार आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून ही योजना सुरू करण्यासाठी कामगार संघटना थेट पंतप्रधानांनाच साकडे घालणार आहेत.कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) सप्टेंबर २०१४ पासून ही योजना सुरू केली होती. या योजनेतहत पेन्शनधारकांना किमान १ हजार रुपये दरमहा पेन्शन दिली जात होती. यासंबंधीची अधिसूचना १९ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आली होती. ३१ मार्चपासून पुढे ही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून निर्देश न मिळाल्याने ईपीएफओने ही योजना एप्रिल २०१५ पासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे ईपीएफओने क्षेत्रीय कार्यालयांना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.हिंद मजदूर सभेचे सचिव ए. डी. नागपाल यांनी सांगितले की, सर्व कामगार संघटना हा मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित करण्यासाठी त्यांना निवेदन देणार आहोत. तसेच निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन केले जाईल. नागपाल हे ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनीच ही योजना घोषित केली होती. फक्त सहा महिन्यांसाठी ही योजना होती काय? असा सवालही त्यांना उपस्थित केला.
किमान एक हजार रुपये पेन्शनची हमी देणारी ईपीएफ योजना स्थगित
By admin | Updated: April 11, 2015 01:23 IST