Join us

शेअर बाजारात विक्रमांचे वर्ष

By admin | Updated: December 20, 2014 00:38 IST

केंद्रामधील सत्तेवर आलेले स्थिर सरकार, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वाढता दर, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण गुंतवणूक अशा अनेक

प्रसाद जोशी - केंद्रामधील सत्तेवर आलेले स्थिर सरकार, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वाढता दर, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण गुंतवणूक अशा अनेक सकारात्मक गोष्टींमुळे सन २०१४ हे वर्ष भारतीय शेअर बाजारामध्ये विक्रमाचे वर्ष राहिले. सर्वच प्रमुख निर्देशांकांनी या वर्षामध्ये विक्रमाचे एव्हरेस्ट सर करीत नवीन उंची गाठली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील, मिडकॅप आणि स्मॉलकॅप तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.संवेदनशील निर्देशांक तीस हजारांचा तर निफ्टी दहा हजारांचा टप्पा पार करण्याची व्यक्त होत असलेली अटकळ मात्र या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. असे असले तरी या टप्प्याला दृष्टीपथात आणण्याचे काम या वर्षाने निश्चितच केले आहे. १० डिसेंबर रोजी बाजाराच संवेदनशील निर्देशांक २७,८३१.१० अंशांवर बंद झाला. २८ नोव्हेंबर रोजी बाजाराने २८,६९३ अशी विक्रमी उंची गाठली. मागील वर्षाच्या बंद निर्देशांकाशी तुलना करता या निर्देशांकामध्ये ६६६०.४२ अंश एवढी वाढ झाली. याचाच अर्थ वर्षभरामध्ये निर्देशांक ३१.४६ टक्के वाढला. निफ्टीची वाढ ३२.५४ टक्के एवढी झाली.२८ नोव्हेंबर रोजी या निर्देशांकाने ८५८८.२५ असा नवीन उच्चांक नोंदविला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी अधिक चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्यामध्ये अनुक्रमे ५३.६२ आणि ७२.६८ टक्कयांनी वाढ नोंदविली गेली आहे. या निर्देशांकांनी अनुक्रमे ४ आणि ५ डिसेंबर रोजी १०५२५.८२ आणि ११४७४.६९ अशी उंची गाठली आहे.चलनवाढीच्या समस्येवरही सरकारने योजलेले उपाय आता चांगली फळे देत आहेत. मागील वर्षामध्ये चलनवाढीचा दर १०.९२ टक्के होता तो यंदा ६.६५ टक्कयांपर्यंत खाली आला आहे.