Join us

शेअरबाजार तीन तास बंद

By admin | Updated: July 4, 2014 05:51 IST

नेटवर्क बंद पडल्यामुळे मुंबई शेअर बाजारातील व्यवहार सकाळी ९.३५ वाजता बंद पडले व पुन्हा १२.४५ वाजता सुरूझाले

मुंबई : नेटवर्क बंद पडल्यामुळे मुंबई शेअर बाजारातील व्यवहार सकाळी ९.३५ वाजता बंद पडले व पुन्हा १२.४५ वाजता सुरूझाले. देशातील सर्वात जुना शेअर बाजार असणाऱ्या बीएसईचे व्यवहार तीन तास का बंद ठेवले याचे उत्तर रोखे व प्रतिभूती विनिमय मंडळ अथवा सेबीने मागितले आहे. आशियाचा सर्वात जुना शेअर बाजार असणाऱ्या बीएसईमध्ये समभाग, चलन, कर्ज इ क्षेत्रात कामकाज होते; पण नेटवर्क ठप्प असल्याने आज रोख्यांच्या किमती वाढविणे शक्य झाले नाही. तांत्रिक नादुरुस्ती दूर होईपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसईने यासंदर्भात सायंकाळी लेखी उत्तर द्यावे असे सेबीने म्हटले आहे. हे उत्तर तयार करण्याचे काम चालू आहे. याच कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे काम चालू असल्याने व्यवहारात फारसा फरक पडलेला नाही असे सूत्रांनी सांगितले. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३२४.८६ अंकांनी वाढला होता. २५,८४१.२१ च्या जवळ जाऊन हा निर्देशांक परतला. १० जूनला निर्देशांक २५,५८३.७ असा सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा तेजीची चाहूल लागली.