Join us

्रपान १ -मुख्य बातमी

By admin | Updated: October 25, 2014 22:48 IST

शिवसेनेविना शपथविधी?

शिवसेनेविना शपथविधी?
चर्चेची कोंडी कायम: शिवसेनेला नमविण्यासाठी भाजपाचे दबावतंत्र
मुंबई: नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त समिप येऊन ठेपला तरी शिवसेनेसोबतच्या चर्चेची कोंडी कायम ठेऊन भाजपाने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. त्यामुळे गुरुवारी होणार्‍या शपथविधी समारंभात कदाचित भाजपाचेच मंत्री शपथ घेतील, अशी राजकीय अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच की काय, एका खासगी समारंभानिमित्त मुंबई भेटीवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या समारंभाला जायचे टाळले.
नवा नेता निवडण्यासाठी सोमवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र दिवाळीसाठी गावी गेलेले सर्व आमदार उपस्थित राहू शकतील की नाही; याबाबत साशंकता असल्याने ही बैठक कदाचित मंगळवारी होऊ शकेल. मंगळवारी नेता निवड झाल्यानंतर बुधवारी राज्यपालांना सरकार स्थापन करण्यासाठीचे पत्र दिले जाईल आणि गुरुवारी शपथविधी होईल, असे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे सोमवारीच मुंबईत दाखल होत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर राजनाथसिंग यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपाने शिवसेनेसोबत पडद्याआडून सुरू असलेली बोलणी थांबलेली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई हे दिल्लीहून परतल्यापासून गेल्या दोन दिवसांत भाजपाकडून शिवसेनेशी कसलाही संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार मंत्रिमंडळाचा आकार लहान ठेवण्यात येणार असल्यामुळे शिवसेनेला कमीत कमी मंत्रिपदे देण्यात येतील आणि त्यासाठीच भाजपा दबवातंत्राचा वापर करत आहे. (विशेष प्रतिनिधी)
--------------------------
शपथविधी वानखेडेवर
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख नेत्याचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असून त्यासाठी २८ आणि २९ तारखेचे बुकींग भाजपाने केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारऐवजी मंगळवारी नेता निवड झाली तर शपथविधी गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. त्यामुळे एक दिवसाची मुदत वाढवून घेण्यात येणार आहे.
-----------------------------------------
कोट
-------------------
शपथविधी, मंत्रिमंडळ अथवा इतर कुठच्याही बाबींसाठी अद्याप आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. कदाचित सोमवारपासून चर्चा होऊ शकेल.
-खा. संजय राऊत, शिवसेना नेते
-------------------------------------
उद्धव यांना निमंत्रण नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसाठी दिल्लीत २६ रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचे निमंत्रण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाले नसल्यामुळे ते दिल्लीला जाणार नाही, असे शिवसेनेतील सुत्रांनी सांगितले.
----------------------------------------
उद्धवनी टाळली मोदींची भेट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या समारंभाचे निमंत्रण मिळुनदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या समारंभला जायचे टाळले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे.
--------------------------------
घटक पक्षांना न्याय द्या-शे˜ी
या निवडणुकीत घटक पक्षांमुळेच भाजपाला मोठे यश मिळाले असून मंत्रिमंडळात या पक्षांना योग्य ते स्थान मिळावे, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शे˜ी यांनी व्यक्त केली. शिवसेनेवर आम्ही टीका केली नाही, त्याचाच फटका आम्हाला बसला, असेही ते म्हणाले.
-------------------------------
गडकरींच्या भागवत भेटीची चर्चा
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत यांच्याशी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी, अशी चर्चा सुरू असताना गडकरी यांची भागवत भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. भागवत शुक्रवारी रात्री दिल्लीहून नागपुरात परताच रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. फडणवीस यांच्या नावाला संघाने हिरवा कंदील दिल्याची चर्चा सुरू असतानाच गडकरींनी शनिवारी सकाळी संघ मुख्यालय गाठले. विदर्भातील भाजपाच्या बहुसंख्य आमदारांनी गडकरी यांच्या हाती राज्याची सूत्रे देण्याची मागणी केली आहे.