नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७७७ अंकांनी वाढला. हा सेन्सेक्सचा सात वर्षांतील सर्वोच्च एक दिवसीय लाभ ठरला आहे. सरकार आर्थिक मजबुतीकडे लक्ष देऊन वित्तीय तूट ३.५ टक्क्यांवर मर्यादित ठेवील, अशी घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल केली होती. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे रिझर्व्ह बँकेला धोरणात्मक व्याजदरात कपात करणे शक्य होईल, असे मानले जात आहे. त्याचा योग्य परिणाम बाजारावर दिसून आला. त्याच बरोबर जागतिक पातळीवरही सकारात्मक वातावरण होते. बीएसई सेन्सेक्स २३,७७९.३५ अंकांवर बंद झाला. त्याने ७७७.३५ अंकांची अथवा ३.३८ टक्क्यांची वाढ नोंदविली. १८ मार्च रोजी २00९ रोजी सेन्सेक्स २,११0.७९ अंकांनी वाढला होता. त्यानंतरची सर्वोच्च वाढ म्हणून आजच्या उसळीची नोंद झाली. काल सेन्सेक्स १५२.३0 अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३५.२५ अंकांनी अथवा ३.३७ टक्क्यांनी वाढला.
सेन्सेक्सची ७ वर्षांतील सर्वाधिक मोठी उसळी!
By admin | Updated: March 2, 2016 02:44 IST