मुंबई : सलग सहा व्यावसायिक सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम लावताना सेन्सेक्सने बुधवारी ३५९ अंकांची उसळी घेतली. आठ महिन्यांच्या नीचांकावरून उसळलेला सेन्सेक्स २६,८४0.५0 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स मजबुतीसह २६,५१७.३२ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढत राहिला. एका क्षणी त्याने २६,९३४.७४ अंकांपर्यंत उसळी घेतली होती. त्यानंतर नफा वसुली सुरू झाली. त्यामुळे तो थोडासा खाली आला. तरीही ३५९.२५ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २६,८४0.५0 अंकांवर बंद झाला. ही वाढ १.३६ टक्क्यांची राहिली. तत्पूर्वीच्या सहा सत्रांत सेन्सेक्सने तब्बल १,३६७.७४ अंक गमावले होते. ब्रोकरांनी सांगितले की, गुणात्मक खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजार तेजीत आला. तसेच ‘एमएससीआय’ने चिनी समभागांना आपल्या निर्देशांकात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचा लाभही बाजाराला मिळाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या निफ्टीनेही घसरणीचा सात दिवसांचा कल मोडून काढीत तेजीची नोंद केली. १0२.0५ अंकांच्या अथवा १.२७ टक्क्यांच्या वाढीसह निफ्टी ८,१२४.४५ अंकांवर बंद झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समध्ये भेलचा समभाग सर्वाधिक ४.२१ टक्क्यांनी वाढून २५१.४0 रुपयांवर पोहोचला. त्याखालोखाल विप्रोचा समभाग ३.६0 टक्के वाढून ५६३.३0 रुपयांवर बंद झाला. वाढीचा लाभ मिळालेल्या अन्य कंपन्यांत बजाज आॅटो, आरआयएल, एलअँडटी, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टीसीएस आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे. साखर कंपन्यांच्या समभागांचे भाव आज चढले. भारत सरकारने कारखान्यांना ६ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केल्यामुळे हा परिणाम दिसून आला. कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकबाकी तब्बल २१ हजार कोटींवर गेल्यामुळे सरकारने कर्ज देण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ६४५.0२ कोटी रुपयांचे समभाग विकले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ३५९ अंकांनी उसळला
By admin | Updated: June 11, 2015 00:13 IST