Join us

सेन्सेक्स ११८ अंकांनी उसळला

By admin | Updated: May 16, 2015 01:07 IST

आठवडा संपत असताना शेअर बाजारांनी शुक्रवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११८ अंकांनी वाढून २७,३२४ अंकांवर बंद झाला

मुंबई : आठवडा संपत असताना शेअर बाजारांनी शुक्रवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११८ अंकांनी वाढून २७,३२४ अंकांवर बंद झाला. यंदा मान्सून वेळेवर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजार उसळले आहेत. आज दिवसभर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २७,२३३.९0 अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो २७,३७९.५७ अंकांपर्यंत वर चढला. मात्र त्यानंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले आणि बाजार घसरला. एका क्षणी तो २७,१५९.७६ अंकांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतर बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली. सत्रअखेरीस ११७.९४ अंकांची अथवा 0.४३ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,३२४ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ४५.0४ अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८.१५ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्यांनी वाढून ८,२६२.३५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १६ कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. एसबीआय, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागांनी मोठी वाढ नोंदविल्यामुळे सेन्सेक्स वर चढल्याचे दिसून आले. भारती एअरटेल, एमअँडएम, इन्फोसिस, ओएनजीसी, मारुती सुझुकी, एलअँडटी, बजाज आॅटो आणि टाटा मोटर्स यांचे समभागही वर चढले. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,४५५ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२३४ कंपन्यांचे समभाग घसरले. ११५ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल घसरून २,५३३ कोटींवर आली. काल ती २,९६५.४१ कोटी होती.