Join us

सेन्सेक्स ६६१ अंकांनी आपटला

By admin | Updated: June 3, 2015 00:05 IST

हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा सुधारित अंदाज जारी केल्यामुळे दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे.

मुंबई : हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा सुधारित अंदाज जारी केल्यामुळे दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या दुमाही आढाव्यावरही या भीतीचे सावट दिसून आले. याचा थेट परिणाम होऊन शेअर बाजारात आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ६६१ अंकांनी कोसळून २७,१८८.३८ अंकांवर बंद झाला. बाजार सुरू झाला तेव्हा वातावरण सकारात्मक होते. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स तेजीत होता. एका क्षणी तो २७,९0२.५३ अंकांवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेचा दुमाही आढावा जाहीर होताच बाजारात पडझड सुरू झाली. मिळविलेली वाढ सेन्सेक्सने गमावली. सत्र अखेरीस ६६0.६१ अंकांची अथवा २.३७ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,१८८.३८ अंकांवर बंद झाला. ६ मेनंतरच्या काळातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९६.९५ अंकांनी अथवा २.३४ टक्क्यांनी घसरून ८,२३६.४५ अंकांवर बंद झाला. रुपयाच्या घसरणीचा फटकाही निर्देशांकांना बसला. १२ पैशांच्या घसरणीसह रुपयाची डॉलरच्या तुलनेतील किंमत ६३.८२ रुपयांवर गेली. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,८७५ कंपन्यांचे समभाग कोसळले. ८0४ कंपन्यांचे समभाग वाढले. १0४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल वाढून ३,0८६.६८ कोटी रुपये झाली. आदल्या सत्रात ती २,६९९.२५ कोटी रुपये होती. (वृत्तसंस्था)