मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या संपूर्ण अर्थसंकल्पाआधी सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. बँकिंग, तेल आणि गॅस तसेच एफएमसीजी या क्षेत्रात विक्रीचा मारा झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५६ अंकांनी घसरून २९ हजार अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८.६५ अंकांनी घसरला.३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २९,३१६.५८ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो २९,३६२.९८ अंकांपर्यंत वर चढला होता. तथापि, नंतर बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. आरआयएल, आयटीसी आणि एसबीआय या ब्ल्यूचिप कंपन्यांत झालेल्या विक्रीचा फटका सेन्सेक्सला बसला. घसरणीला लागलेला सेन्सेक्स एका क्षणी २८,९१३.१६ अंकांवर घसरला. सत्र अखेरीस तो २८,९७५.११ अंकांवर बंद झाला. २५६.३0 अंकांची घसरण सेन्सेक्सने दर्शविली. ही घसरण 0.८८ टक्के आहे. त्या आधी शुक्रवारी सेन्सेक्सने २३0 अंक गमावले होते. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८.६५ अंकांनी अथवा 0.८९ टक्क्यांनी घसरून ८,७५४.९५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स २५६ अंकांनी घसरला
By admin | Updated: February 23, 2015 23:41 IST