ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. - मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक मंगळवारी ५८६.६५ अंकांनी किंवा २.२३ टक्क्यांनी कोसळला आणि दिवसाअखेरीस २५,६९६.४४ या एका वर्षाच्या नीचांकावर बंद झाला. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आधीच्या तिमाहीच्या ७.५ टक्क्यांच्या तुलनेत घसरून ७ टक्के झाल्यामुळे शेअर बाजारात त्याचे तीव्र पडसाद उमटले.
५० शेअर्सचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांकही २.३३ टक्के किंवा १८५.४५ अंकांनी घसरला. जवळपास सगळ्याच क्षेत्रातल्या शेअर्सची आज जोरदार विक्री झाली. सेन्सेक्सची पडझड होण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
- GDP वाडीचा मंदावलेला वेग.
- चिनी अर्थव्यवस्था मंदावत असून आणखी अडचणीत येण्याची भीती.
- औद्योगिक उत्पादनात घट होत असून संबंधित निर्देशांक जुलैमध्ये ५२.७ वरून ५२.३ इतका घसरला.
- चीनचाही औद्योगिक उत्पादनवाढी निर्देशांक ५० वरून घसरून ४९.७ वर आला.
- जपानचा निर्देशांकही ३.८४ टक्क्यांनी घसरला.
- अमेरिकी फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात वाढ करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे झाले तर भारतात येणारी विदेशी गुंतवणूक मंदावण्याची भीती आहे.
- खनिज तेलाचा भाव ८ टक्क्यांनी वाढला असून त्याचा परिणामही बाजारावर झाला.
- ऑगस्टमध्ये स्थानिक वित्त संस्थांनी १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात केली, तर विदेशी वित्त संस्थांनी १७ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. स्थानिक वित्त संस्थांमुळे बाजार जरातरी सावरला अन्यथा तो आणखी कोसळला असता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.