मुंबई : रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात २५ आधार अंकांची कपात केल्यानंतर शेअर बाजारांत नफावसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१६ अंकांनी घसरला. त्यामुळे तो पुन्हा २५ हजार अंकांच्या खाली आला.बाजारातील सूत्रांनी सांगितले की, राखीव रोखीच्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल केला नाही. त्यामुळेही बाजारात घसरण झाली. व्याजदर संवेदनक्षम असलेल्या बँकिंग, जमीन-जुमला आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. महागाईचा दर ५ टक्क्यांवर राहील, असे नमूद करून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी यापुढे वृद्धीला अनुकूल धोरणे राहतील, असे संकेत दिले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ५१६.0६ अंकांनी अथवा २.0३ टक्क्यांनी घसरून २४,८८३.५९ अंकांवर बंद झाला. ११ फेब्रुवारीनंतरची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५५.६0 अंकांनी अथवा २.0१ टक्क्यांनी घसरून ७,६0३.२0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २९ कंपन्यांचे समभाग घसरले. फक्त लुपीनचे समभाग वाढले. बड्या कंपन्यांचे समभाग सुमारे ६.२३ टक्क्यांपर्यंत खाली आले. आयसीआयसीआय बँकेचा समभाग ५.४५ टक्क्यांनी खाली आला. एसबीआयला ५.३८ टक्क्यांचा, अॅक्सिस बँकेला २.८९, एचडीएफसी बँकेला १.0३, तर एचडीएफसीला 0.0७ टक्क्यांचा फटका बसला.
सेन्सेक्स कोसळला
By admin | Updated: April 6, 2016 04:50 IST