मुंबई : देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून गाजलेल्या सत्यम कॉम्प्युटरप्रकरणी मंगळवारी सेबी (सिक्यरिटी एक्सेंज बोर्ड आॅफ इंडिया)ने महत्त्वपूर्ण निकाल देत कंपनीचा संस्थापक रामलिंगम राजूसह कंपनीच्या तत्कालीन चार संचालकांना १४ वर्षे भांडवली बाजारापासून दूर राहण्याचे आदेश देतानाच तब्बल १८४९ कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.घोटाळ्याच्या माध्यमातून कंपनीने सुमारे १८४९ कोटी रुपयांची माया गोळा केली होती. बाजारातून मिळवलेला हा १८४९ कोटी रुपयांचा हा अवाजवी लाभ सेबीकडे आगामी ४५ दिवसांत जमा करायचा असून, यावर ७ जानेवारी २००९ पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षासाठी १२ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. सेबीने ६५ पानी निकालपत्रात असे नमूद केले आहे की, या सर्वांनी पूर्वनियोजित पद्धतीने हा पांढरपेशा वित्तीय घोटाळा केला असून त्यामुळे सत्यम कंपनी आणि तीचे गुंतवणूकदार यांची लुबाडणूक झाली आहे. विशेष म्हणजे, मावळत्या संपुुआ सरकारने वटहुकूम काढून दिलेल्या वाढीव अधिकारांचा वापर करत सेबीने ही कारवाई केली आहे. सेबीचे संचालक राजीवकुमार अगरवाल यांनी हा निकाल दिला आहे. सत्यम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
सत्यमच्या रामलिंग राजूला १४ वर्षांचा ‘वनवास’!
By admin | Updated: July 16, 2014 01:36 IST