Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅण्डसेट बदलून न दिल्याने सॅमसंग कंपनीला फटका

By admin | Updated: June 19, 2014 04:34 IST

वॉरंटीच्या काळात बिघाड झालेला आणि दुरुस्तही होऊ न शकलेला मोबाईल हॅण्डसेट बदलून न देता ग्राहकाची फसवणूक करणे सॅमसंग कंपनीला महागात पडले आहे

पुणे : वॉरंटीच्या काळात बिघाड झालेला आणि दुरुस्तही होऊ न शकलेला मोबाईल हॅण्डसेट बदलून न देता ग्राहकाची फसवणूक करणे सॅमसंग कंपनीला महागात पडले आहे. सॅमसंग कंपनीने तक्रारदाराची मोबाईलची मूळ किंमत २० हजार ८०० रुपये परत करावे, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. इतकेच नव्हे तर शारीरिक, मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून २ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि मोहन पाटणकर यांनी दिला. नितीन शंकर महाबळ (रा. कोथरूड) यांनी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. नवी दिल्ली, पुण्यातील वेदांत सर्व्हिसेस आणि महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, एरंडवणा यांच्याविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. महाबळ यांनी ८ मार्च २०१३ रोजी महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स येथून २० हजार ८०० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल विकत घेतला. काही दिवसांतच तो मोबाईल सदोष असल्याचे दिसून आले. मोबाईलच्या स्टिरिओ सिस्टीममध्ये बिघाड झाला होता. हँडस् फ्री अवस्थेत मोबाईलचा स्टिरिओ चालत नव्हता. १८ आॅगस्ट २०१३ रोजी हॅण्डसेट दुरुस्तीसाठी देण्यात आला. मात्र, तो दुरुस्त झाला नाही. त्यानंतरही दोनदा त्यांनी हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिला, तरीही दुरुस्त झाला नाही. दुरुस्ती करण्यासारखे काहीही नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे महाबळ यांनी मोबाईल बदलून देण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी महाबळ यांनी संपर्क साधला. तरीही मोबाईल बदलून मिळाला नाही. त्यामुळे महाबळ यांनी १८ डिसेंबर २०१३ रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. वेदांत सर्व्हिसेस, महेंद्र इलेक्ट्रॉनिक अँड इंडिया इलेक्ट्रॉनिक्स एरंडवणा यांच्यावतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. सॅमसंग इंडियाच्या वतीने तक्रारदारांचा अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)