नवी दिल्ली : बेमोसमी पावसाने तामिळनाडूला जबरदस्त तडाखा दिल्याने राज्यातील जनजीवन कोलमडले असून चेन्नईत अतिवृष्टीने हाहाकार उडविला आहे. शहर पाण्याखाली गेल्याने उद्योग-व्यापार ठप्प झाला आहे. चेन्नईत १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज द असोसिएटेड चेम्बर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया (असोचेम) या संघटनेने वर्तविला आहे.पुरामुळे तामिळनाडूतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक बंद आहे. रस्ते, उड्डाणपूल पाण्याखाली गेली आहेत. शहरातील अनेक इमारती, बाजारपेठेतील बहुसंख्य दुकाने, कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये जलमय झाली आहेत.चेन्नईचे विमानतळही पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे विमान वाहतूक बंद असल्याची स्थिती आहे. उद्योग-व्यापार, सरकारी, खासगी कंपन्यांची बहुसंख्य कार्यालये बंद आहेत. पुरामुळे चार-पाच दिवसांत शहरातील सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले. छोटे व मध्यम उद्योग, आॅटोमोबाईल व इंजिनीअरिंगच्या कंपन्या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन व इतर उद्योग क्षेत्राला पुराचा मोठा फटका बसला आहे. चेन्नईत जगभरातील आॅटो कंपन्यांकडून वाहनांची निर्मिती केली जाते.
चेन्नईत १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST