Join us  

अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका; गेल्या ६ वर्षात महागाई दराने गाठला उच्चांक तर औद्योगिक उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 8:16 PM

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आयआयपीची वाढ ०.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे,

नवी दिल्ली - मागील काही आठवड्यापासून देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यातच बुधवारी महागाई आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढविली. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्याने जानेवारीत किरकोळ महागाईचा दर ७.५९ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या सहा वर्षातील हा उच्चांक आहे. महागाई दरात मागील सहा महिन्यापासून वाढ होत आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१९ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ दर ७.३५ % होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ते १.९७ % होता. जानेवारीत महागाई दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ४ टक्के टार्गेटच्या तुलनेत खूप उच्च आहे. 

जानेवारीत भाजीपाल्याचा महागाई दर ५०.१९ टक्के वाढला, तर डिसेंबर २०१९ मध्ये हा आकडा ६०.५० टक्के होता. त्याचप्रमाणे तेलबियाचा महागाई दर ५.२५ टक्के होता. डाळी व त्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या महागाईचा दर १६.७१ टक्के होता.

उद्योगांची गतीवरही पडला फरकत्याचबरोबर डिसेंबरमध्ये उद्योगांच्या गतीमध्येही घट झाली आहे. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या वाढीच्या दरात ०.३ टक्के घसरण झाली. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यात २.५ टक्क्याची वाढ नोंदली गेली. उत्पादन क्षेत्रात उत्पादन कमी झाल्यामुळे ही घसरण झाली आहे.उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात १.२ टक्के घट नोंदवली गेली, जी मागील वर्षी याच काळात २.९% होता. वीज निर्मितीचा विकास दर ०.१ % पर्यंत खाली आला आहे, तर डिसेंबर २०१८ मध्ये यात ४.५% वाढ झाली आहे. खाण क्षेत्रात उत्पादनात ५.४% वाढ झाली आहे, त्या तुलनेत पूर्वीच्या १% घट झाल्याचं दिसून येतं.  

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आयआयपीची वाढ ०.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत ५.७ टक्के वाढ झाल्याची नोंद होती. मात्र यावर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला 

टॅग्स :केंद्र सरकारअर्थव्यवस्थानिर्मला सीतारामन