मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता असली तरी, सामान्य गुंतवणूकदारांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नसून विशेषत: म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीत या गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने ‘इक्विटी’ श्रेणीतील योजनांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत म्युच्युअल फंडातील इक्विटी योजनांत तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून इतर योजनांच्या तुलनेत इक्विटी योजनेत झालेली गुंतवणूक ही कैक पट अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात मिळून ६८ हजार १२१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत यंदा ११ महिन्यांत त्यापेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या इतर साधनांच्या तुलनेत म्युचुअल फंड योजनांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे आणि म्युच्युअल फंडातही प्रामुख्याने इक्विटी योजनांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, केवळ मेट्रो शहर अथवा प्रथम श्रेणीतल्या शहरांतूनच नव्हे, तर नागरी व ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांनीही म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीला पसंती दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत म्युच्युअल फंडात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही नागरी व ग्रामीण भागातून आलेली आहे. - म्युच्युअल फंडात सामान्य गुंतवणूकदारांच्या वाढत्या गुंतवणुकीचे विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञ अजित मेहता म्हणाले की, स्थिर सरकारमुळे आर्थिक सुधारणा होण्याची आशा आणि यामुळे अर्थकारणाच्या होणाऱ्या विकासाचे प्रतिबिंब गुंतवणुकीवरील परताव्याद्वारे उमटेल, हा एक प्रमुख तर्क आहे; पण याचसोबत, भारतीय शेअर बाजारात सध्या असलेल्या अस्थिरतेमुळे दीर्घकाळात उत्तम परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीची एक उत्तम संधी असल्याचे मानले जात आहे.- गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाला पसंती दिली आहे, तर दुसरीकडे, फिक्स्ड् इन्कम श्रेणीच्या गुंतवणुकीवरील परतावा कमी होत असल्यामुळे आता गुंतवणूकदारांनी कमी जोखीम घेत अधिक परताव्यासाठी आता म्युच्युअल फंडाकडे मोर्चा वळविल्याचेही विश्लेषण मेहता यांनी केले.
म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक
By admin | Updated: March 26, 2016 01:19 IST