Join us

रत्नसुंदरवाणी

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

भगवान महावीरांचे विचार मनामध्ये रुजवा

भगवान महावीरांचे विचार मनामध्ये रुजवा
औरंगाबाद : माणसाचा स्वभाव आज कधी नव्हे इतका आक्रमक झाला आहे. या अहंकारापायीच आम्ही संवेदनशीलता गमावून बसलो आहोत. आपल्या मनामध्ये वैरभाव उत्पन्न करून तो जोपासण्यातच आम्हाला धन्यता वाटत आहे. मनामधील वैरभाव हा जीवन किती अस्थिर करतो याची थोडी कल्पना करून पाहा. मनामध्ये क्रोधाचे, वैराचे ओझे, बाळगू नका. मनातील क्रोध आणि वैराला जन्म देणार्‍या अपेक्षा, आग्रह, आसक्ती आणि अहंकार या चांडाळ चौकडीला काबूत ठेवा.
भगवान महावीरांचे विचार मनामध्ये रुजवून जीवनात त्या पद्धतीने बदल घडवून आणण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अपेक्षा, आग्रह, आसक्ती व अहंकार या चार शत्रूंपैकी एक जरी तुमच्या मनात असेल तरी तुमचे संतुलन राहूच शकत नाही. भौतिक सुखाच्या मागे कधी लागू नका. कारण ते क्षणिक आहे. ते गेले तर तुम्ही दु:खी होता; परंतु तुम्ही गेलात तरी त्याला काहीच फरक पडत नाही. हा फरक समजून घ्या, पैशाच्या मागे आपण आयुष्यभर लागतो आणि तो कितीही मिळाला तरी त्याच्या मागे धावण्याचे काही सोडत नाही. तुमच्या मनातील आसक्तीचा भाव कमी का होत नाही.
सर्व जीवांच्या प्रती आपल्या मनात प्रेम असायला हवे. याचबरोबर भगवान महावीरांच्या विचार, शिकवणीने आपण दुर्जनालाही सज्जन बनवू शकतो. सज्जनांनी संघटित बनणे ही आता काळाची गरज बनली आहे आणि संघटित सज्जनांनी सक्रियपणे काम केले, तर या समाजाचेच नव्हे तर सार्‍या देशाचे भवितव्य बदलून जाईल. दुष्प्रवृत्त लोक तुम्हाला संपविण्याकरिता उत्सुक आहेत. तेव्हा त्यांच्यावर मात करा.