नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू २५ फेब्रुवारी रोजीच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवास किंवा मालभाड्यात कोणतीही वाढ न करता महसुलाचे नवे मार्ग धुंडाळण्यावर भर देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नव्या सेमी हायस्पीड ‘गतिमान’ रेल्वेंची भर पडणार असून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये समानता आणण्यावर, तसेच रेल्वे संपत्तीच्या मौद्रीकरणासारख्या काही वैशिष्ट्यांना अर्थसंकल्पात स्थान दिले जाईल असे मानले जाते.सलग दुसऱ्या वर्षी प्रभू प्रवासभाड्यात वाढ करणार नाहीत; मात्र त्यांचा महसूल वाढविण्याच्या नवकल्पनांवर भर असेल. नव्या प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी रेल्वेचे जाळे मजबूत करण्याकडे ते लक्ष केंद्रित करतील. गेल्या वेळी रेल्वेने मालभाडेवाढीचा दणका दिला होता. यावेळी तशी शक्यता नाही. कारण डिझेलचे दर कमी झाले असून सवलत नाकारणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले मानले जात नाही. १० टक्के भाडेवाढ केल्यास रेल्वेला केवळ ४५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असल्यामुळे रेल्वेने तो निर्णय योग्य मानलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रवास भाडे वाढविण्याला पंतप्रधान कार्यालयानेही अनुकूलता दर्शविलेली नाही.
रेल्वेचे प्रवास, मालभाडे वाढणार नाही
By admin | Updated: February 16, 2016 03:22 IST