पुणे : हवामानाच्या लहरीपणामुळे रबी हंगाम संकटात असल्याचे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत रबीच्या केवळ ३७ लाख ८९ हजार (६१ टक्के) हेक्टरवर पेरण्या होऊ शकलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र चौदा लाख हेक्टरने घटले असून, गहू, ज्वारी व तेलबियांच्या क्षेत्रात कमालीची घट होणार आहे. राज्यातील शेतकरी यंदा हवामानाचा लहरीपणा अनुभवत आहे. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. तर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतीवरील संकट आणखी गहिरे झाले. इतके कमी म्हणून की काय अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांना झोडपले. त्यामुळे खरिपाबरोबरच रबी पिकांना देखील विपरीत हवामानाचा फटका बसला आहे. राज्यात रबीचे सरासरी क्षेत्र ६२ लाख ४३ हजार १०० हेक्टर असून, केवळ ३७ लाख ८९ हजार (६१ टक्के) हेक्टरवरील पेरण्या उरकल्या आहेत. गतवर्षी याच काळात ५२ लाख १२ हजार ५०० हेक्टरवरील पेरण्यांची कामे उरकली होती. गहू व ज्वारी या प्रमुख रब्बी पिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३० लाख ९० हजार हेक्टर असून, पैकी १७ लाख ४८ हजार ४०० (५७ टक्के) हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी या काळात ज्वारीच्या २२ लाख १० हजार ८०० हेक्टरवरील पेरण्या उरकल्या होत्या. गव्हाचे सरासरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६०० हेक्टर असून पैकी ५ लाख ९९ हजार ७०० (५१ टक्के) हेक्टरवरील पेरण्या उरकल्या आहेत.
रबी संकटात; ६१ टक्के पेरण्या
By admin | Updated: December 24, 2014 00:07 IST