अकोला : राज्यातील शेतकरी कडधान्यवर्गीय पिकांकडे पाठ फिरवत असल्याने या पिकांचे उत्पादन सातत्याने घटत आहे. यावर उपाययोजना म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आंतरपीक पद्धतीद्वारे कडधान्य पिकांच्या उत्पादनास चालना देण्याचा प्रकल्प राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देतानाच ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.या योजनेत समावेश झालेल्या जिल्ह्यांत अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, ठाणे, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, रायगड, जळगाव, जालना, हिंगोली, पालघर, धुळे, बीड, रत्नागिरी, सातरा लातूर, सिंधूदुर्ग, सांगली, उस्मानाबाद, नाशिक, कोल्हापूर व नांदेड यांचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत वर्ष २०१५-१६ मध्ये आंतरपीक पद्धतीद्वारे कडधान्य पिकांच्या उत्पादनास चालना देण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत कडधान्य पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, क्षेत्र विस्तारास मोठ्या प्रमाणात चालना देणे, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आदी उपायांचा समावेश आहे.
कडधान्य उत्पादनास चालना देणार!
By admin | Updated: November 9, 2015 01:21 IST