सतीश डोंगरे, नाशिक‘जनतेचा पैसा जनतेच्याच कल्याणासाठी’ हे घोषवाक्य समोर ठेवून सार्वजनिक क्षेत्रात उतरलेल्या बॅँका जनतेच्या नव्हे, तर कॉर्पोरेट कंपन्यांच्या दिमतीला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या सात वर्षांत या कंपन्यांनी विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून घेतलेले तब्बल ४.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडवून जनतेच्या पैशाची लूट केली आहे.विशेष म्हणजे एक दोन वेळा नव्हे, तर सातत्याने या कंपन्या कर्जाच्या पैशांवर मौज करीत असतानाही त्यांना तेवढ्याच सन्मानाने कर्ज दिले जात असल्याचे आॅल इंडिया बँक एम्लॉ. युनियनने बुडीत कर्जाबद्दल ‘सार्वजनिक पैशांची लूट थांबवा’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालात नमूद केले आहे. आज बँकिंग क्षेत्राबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली जाते. मात्र बुडीत कर्जांच्या वसुलीबाबत फारसे रोखठोक धोरण अवलंबविले जात नसल्याने बॅँकांची ही स्थिती झाली असावी. मार्च २००८ ते मार्च २०१३ या आर्थिक वर्षातील बुडीत कर्जांचे प्रमाण ४५ ते ५० टक्के असून, दरवर्षाला यामध्ये भर पडत आहे. २०१३ पर्यंत बुडीत कर्जाचा आकडा १.९४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून, मार्च २०१४ मध्ये हाच आकडा २.५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर गेल्या सात वर्षांतील नवीन बुडीत कर्जाचा आकडा ४.९५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचल्याने हा आकडा देशाच्या अर्थव्यवस्थेलाच बाधा पोहचविणारा असल्याचा साक्षात्कार आता बॅँकांना होत आहे. या कर्ज बुडव्या कंपन्यांमध्ये देशातील १७२ मोठे उद्योग आघाडीवर आहेत. या उद्योगांनी मार्च २०१३ पर्यंत ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहेत. त्यातही केवळ चार थकबाकीदारांनी (२३ हजार कोटी रुपये) बुडविलेल्या कर्जाची रक्कम थक्क करणारी आहे. थोडक्यात बॅँकिंग या क्षेत्राची अवस्था दयनीय असून, ती केव्हाही कोलमडून पडण्याची शक्यता आहे. बॅँकांमध्ये उच्चपदस्थ असलेल्या तथाकथित मंडळींनी आपले हितसंबंध जपण्याच्या हेतुने कॉर्पोरेट कंपन्यांवर केलेल्या या उधळपट्टीमुळे कोट्यवधी सामान्य ठेवीदारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, तर बँकांवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक सामान्य कर्जदार यांच्यावरही याचा आघात होण्याची शक्यता आहे. (क्रमश:)
सार्वजनिक बॅँका कंपन्यांच्या दिमतीला
By admin | Updated: December 23, 2014 00:34 IST