Join us

कांद्याचे भाव सावरण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन

By admin | Updated: August 28, 2016 00:56 IST

महाराष्ट्रात कांद्याचे भाव फारच खाली गडगडल्याने शेतकरी अस्वस्थ असून, त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कांद्याचे भाव फारच खाली गडगडल्याने शेतकरी अस्वस्थ असून, त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. निर्यातीमुळे शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळेल, असा विश्वास भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.गडकरी यांनी वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत, कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या हालांची माहिती त्यांना दिली. त्यावर कांद्याची निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा तोडगा श्रीमती सीतारामन यांची काढला आहे. त्यानुसार कांद्यांची निर्यात योजनेद्वारे निर्यातदारांना पाच टक्के रकमेचे एमईआयएस (मर्चंडाइज एक्स्पोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम) कूपन दिले जाणार आहे. त्या कूपनाचा कांदा निर्यातीसाठी वापर करता येईल अथवा ती रक्कम संबंधितांना रोख रकमेच्या स्वरूपात मिळू शकले, असे सीतारामन यांनी सांगितल्याची माहिती नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली. या योजनेनुसार कांद्याचा दर्जा आणि जिथे निर्यात होईल, तो देश यानुसार दोन ते पाच टक्क्यांचे कूपन देत असते. यावर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत पाच पैसे किलो दराने शेतकऱ्यांना कांदा विकायची वेळ आल्याचे गडकरी यांनी वाणिज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असून, त्याचा शिल्लक साठाही भरपूर आहे. चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)