नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या भारतात साखरेचे गेल्या पाच महिन्यांत १.९४ कोटी टन उत्पादन झाले. ‘इस्मा’ या उद्योग संघटनेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. विपणन वर्ष आॅक्टोबरपासून सुरू होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) २०१४ -१५ च्या आॅक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या साखर उत्पादनाचा आकडा जाहीर केला. साखरेचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी, तर उसाचे जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी वाढू शकते, असे इस्माने सांगितले. सध्या ही थकबाकी १४ हजार ५०० कोटी रुपये आहे. सरकारने १४ लाख टन कच्ची साखर निर्यात करण्याबाबत ४,००० रुपये प्रति टन सबसिडी देण्याच्या निर्णयाची अधिसूचना काढली पाहिजे. इस्माने म्हटले की, २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत देशातील ५११ साखर कारखान्यांनी १.९४ कोटी टन साखरेचे उत्पादन केले, तर २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत ४५५ साखर कारखान्यांनी १.७ कोटी टन साखरेचे उत्पादन केले होते. यावर्षी उत्पादनाचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढले आहे. ४इस्माने २०१४-१५ विपणन वर्षात साखरेचे २.६ कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला. गेल्या वर्षी हे उत्पादन २.४३ कोटी टन एवढे होते. वार्षिक घरगुती मागणी २.४८ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे.
साखरेचे पाच महिन्यात १.९४ कोटी टन उत्पादन
By admin | Published: March 05, 2015 12:03 AM