Join us  

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, भाजीपाल्यांनंतर आता डाळींचे दर कडाडले; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 3:39 PM

गेल्या वर्षी हरभरा डाळीची किंमत 70-80 रुपये प्रति किलो होती. मात्र, यावेळी ती 100 रुपयांच्या पुढे गेली आहे.

ठळक मुद्देदिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या भावात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणी रोजच वाढत आहेत. एकीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यातच आता सर्वसामन्यांना आणखी जळ बसण्याची शक्यता आहे, कारण भारतात डाळींचे दरही वाढू लागले आहेत. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या भावात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी हरभरा डाळीची किंमत 70-80 रुपये प्रति किलो होती. मात्र, यावेळी ती 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तूरडाळ 115 रुपये प्रति किलोला विकली जात आहे.  सरकारी एजन्सी नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) पुरवठा वाढविण्यासाठी स्टॉक रिलीज केला पाहिजे, असी मागणी व्यापाऱ्यांची केली आहे.

सध्या डाळींचा पुरवठा कमी झाला आहे तर, मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी 2020-21 पर्यंत आयात कोटा जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पुरवठ्याची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारचे मत आहे आणि पुढील तीन महिन्यांत खरीप हंगामातील पीक बाजारात येण्यास सुरवात होईल. तसेच, यावर्षी बंपर उत्पादन अपेक्षित आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा ​​यांनी भारतीय डाळी व धान्य असोसिएशनच्या (आयपीजीए) वतीने आयोजित वेबिनारमध्ये सांगितले होते की, खरीप हंगामात डाळींचे एकूण उत्पादन 93 लाख टन होईल, अशी भारताला अपेक्षा आहे.  गेल्यावर्षी तूरडाळीचे उत्पादन 38.3 लाख टन झाले होते, यावेळी हेच उत्पादन 40 लाख होण्याची शक्यता आहे.

डाळींचे दर का वाढत आहेत ?लॉकडाऊन काळात तूरडाळीचे दर प्रति किलो 90 रुपयांनी वाढले आणि नंतर ते 82 रुपये प्रति किलोवर गेले. मात्र, आता किंमत पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. आता सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे कर्नाटकातील तूरडाळीचे पिकाचे नुकसान होईल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे उत्पन्नामध्ये 10% तोटा होऊ शकतो. 2010-21 साठी कडधान्याच्या आयातदारांनी तूर आयात इम्पोर्ट कोटा जाहीर करावा अशी मागणी केली आहे. एप्रिलमध्ये सरकारने 4 लाख टन तूर आयात कोटा जाहीर केला, जो अद्याप वाटप झालेला नाही. यापैकी 2 लाख टन तूर मोझांबिकहून येणार होती. त्यामुळे देशात डाळींच्या किंमती वाढत आहेत. 

टॅग्स :व्यवसाय