Join us

काळा पैशाच्या चौकशीला प्राधान्य

By admin | Updated: May 1, 2015 23:24 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत मनी लाँडरिंग प्रकरणात ५३४६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे,

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत मनी लाँडरिंग प्रकरणात ५३४६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे, जे काळ्या पैशाच्या तपासाला ईडीने दिलेल्या उच्च प्राधान्याचेच निदर्शक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत ईडीने मनी लाँडरिंगविरोधी कायद्याअंतर्गत एकूण ३६५७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. या वर्षी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीसोबतच ईडीने २०१४-१५ मध्ये गत वर्षाचा आपला विक्रम मोडीत काढत तब्बल ९००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केलेली आहे.सक्तवसुली संचालनालयाचे संचालक राजन कटोच यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सक्तवसुली दिन’ कार्यक्रमात ही माहिती दिली. कटोच म्हणाले, ‘नवे सरकार सत्तेवर आल्याने आणि काळ्या पैशाच्या समस्येशी लढण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याने ईडी गेल्या वर्षी खूप व्यस्त होते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे आम्ही गेल्या वर्षी उत्तम कामगिरी केली, हे सांगताना मला अत्यानंद होतो आहे. २०१४-१५ मध्ये ईडीने हवाला आणि मनी लाँडरिंगच्या १९१८ प्रकरणांचा तपास पूर्ण केला. गत वर्षी हा आकडा १८३६ होता. याशिवाय २००० प्राथमिक चौकशीही पूर्ण केली. मागील वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणातील १७७३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मात्र या वर्षी ३६५७ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीचे एकूण मूल्य आता ९००० कोटी रुपये झाले आहे. लोकांचा विश्वास आणि विश्वासार्हता ही आमची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. या वर्षात आम्ही फार चांगले काम केले आहे. ईडीला ५९ वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही ही संस्था स्वत:मध्ये सुधारणा करीत आहे, असे काटोच यांनी स्पष्ट केले.